काही माध्यमांतून कर्जमाफी करून देण्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. कायदेशीर फी भरून घेऊन कर्जमाफीची प्रक्रिया करून देऊ असे दावे या जाहिरातीतून केले जातात. पण अशा जाहिराती पूर्णपणे फसव्या असून, बँकांचे कर्ज कोणत्याही स्थितीत भरावे लागणार आहे, असा निर्वाळा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिला आहे.
कर्जदात्यांनी अशा जाहिरातींनी भुलू नये, असेही RBIने म्हटले आहे.
“अशा संस्था किंवा व्यक्ती वृत्तपत्रांतून आणि सोशल मीडियातून कर्जमाफीच्या जाहिराती करत आहेत. सेवाशुल्क आणि कायदेशीर फी भरून घेऊन कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊ, असे दावे या जाहिरातीतून केले जात आहेत. पण या संस्थांना असे कोणतेही अधिकार नाहीत. काही ठिकाणी असे दिसून आले आहे की काही व्यक्तीही अशा प्रकारच्या जाहिराती करत आहेत. यामुळे कर्जवसुलीसाठी बँका करत असलेल्या प्रयत्नांना खीळ बसत आहे. बँका आणि वित्तसंस्था यांची देणी नाही परतफेड केली तरी चालतात, असा समज या जाहिरातीतून करून दिला जात आहे. याचा अंतिमतः फटका ठेवीदारांना बसतो,” असे RBIने म्हटले आहे.