राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली असून महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा दोन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
या आधी जून महिन्यात राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता देण्याचं जाहीर केलं होतं. आता त्यात दोन टक्क्यांची वाढ करून तो 44 टक्के इतका करण्यात आला आहे. या संबंधित निर्णय हा बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Maharashtra cabinet Meeting) होणार असल्याची माहिती आहे.
या आधी जून महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज अर्थ विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 42 टक्क्यांवरुन 44 टक्के करण्यात आलेला आहे.
केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ
केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी (Diwali 2023) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Employees) महागाई भत्त्यात (DA Hike) 4 टक्के वाढ केली आहे. यानंतर त्यांना मिळणारा डीए (DA) आता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. सरकार वर्षातून दोनदा DA मध्ये सुधारणा करतं. ज्याचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून दिला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे, देशात सुमारे 52 लाख कर्मचारी केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतात आणि 60 लाख पेन्शनधारक आहेत, ज्यांना सरकारच्या या मोठ्या निर्णयाचा फायदा होणार आहे.
कर्मचार्यांच्या पगाराचा डीए हा महत्त्वाचा भाग असून त्यात वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्मचार्यांना मिळणाऱ्या पगारावर होतो. पण ते कसे ठरवले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? महागाईचा दर लक्षात घेऊन सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे. यासाठी CPI-IW डेटा मानक मानला जातो.