श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्राचा सविस्तर विकास आराखडा जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यास तत्काळ मंजुरी देऊन एक हजार कोटी निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबईत निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांना आराखडा तपासून सादर करण्याचे आदेश दिले.
अंबाबाई मंदिरात दररोज देशभरातून 20 ते 25 हजार भाविक येतात. नवरात्रोत्सव आणि दिवाळीसह इतर सुट्ट्यांत रोज लाखावर भाविक असतात. त्या तुलनेत मंदिर परिसरातील उपलब्ध सोयी-सुविधा तोकड्या पडत आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मंदिर असून, आजूबाजूला मोठ्या बाजारपेठा व निवासी संकुले आहेत. दुकानदार व फेरीवाल्यांनी परिसर गजबजलेला आहे. सोयी-सुविधांसह भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. वाराणसी व मथुरा येथील मंदिरांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिराचा विकास करण्याची गरज आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.