Logo
राजकारण

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, सहकाऱ्यांना अश्रू अनावर; आंतरवालीत गर्दी वाढली

एकीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मात्र, मागील चार दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. आज सकाळपासून जरांगे यांचे हात थरथरतायात, बोलण्यास देखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, 'एबीपी माझा'शी बोलतांना मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून, गावकरी, मित्र सहकारी त्यांना वारंवार पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह करत आहेत. सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी देखील जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली. मात्र, सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नसून, पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. तर, काल रात्रीपासून जरांगे यांची प्रकृती खालवल्याने त्यांचे जवळचे सहकारी चिंताग्रस्त झाले आहेत. मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या... मराठा आरक्षणाबाबत सरकराने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करून, विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करणयात यावे. आंतरवाली सराटीसह राज्यभरात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. राज्यभरात शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या मराठा कुणबी नोंदींची यादी संबंधित ग्रामपंचायतवर लावण्यात यावी. आता कठोर उपोषण... मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून चौथ्यांदा आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यंदाचे उपोषण अत्यंत कठोर असणार असल्याचे जरांगे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार जरांगे यांनी गेल्या चार दिवसांत पाण्याचा गोठ देखील घेतला नाही. सोबतच तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार घेण्यास आणि तपासणी करण्यास देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. तर, त्यांची प्रकृती खालावत असल्याने गावकऱ्यांसह जरांगे यांचे सहकारी चिंताग्रस्त झाले आहेत.