मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. या मागणीसाठी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा देत मंगळवार (दि. ३१) पासून दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे.उपोषणाला बसण्यापूर्वी खासदार हेमंत पाटील यांनी हस्तलिखित एक प्रसिद्धी पत्र काढून आपण मौनव्रत धारण करून लाक्षणिक उपोषण सुरू करत असल्याची माहिती दिली.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये लिहिले आहे की, आज, मी मराठा समाजास आरक्षण मिळावे तसेच इतर प्रश्न देशाच्या राजधानीत गांभीयाने घ्यावा, यासाठी लाक्षणीक उपोषणास बसत आहे. मी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील हिंगोली भागाचे प्रतिनिधीत्व करतो. या भागातील मराठा समाज मोठ्या प्रमाणांत शेती करणारा असून, नापिकी, वातावरणातील बदल, शेतीमालाला मिळणारा अल्प दर यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मराठा समाज आज अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये हालाखीचे जीवन जगत आहेत. बेरोजगारीमुळे गावा गावात शेकडो तरुण वैफल्यग्रस्त जीवन जगत असून, अनेक जण बिन-लग्नाचे आहेत.मागील ७ दिवसापासून मनोज जरांगे पाटील अन्न-पाणी त्यागुन उपोषणास बसले असून त्यांच्या समर्थनार्थ गावा-गावातुन शेकडो युवक : महिला उपोषणास बसले आहेत. या प्रश्नाचे गांभीर्य लोकसभेच्या व्यासपीवर मांडणे माझे कर्तव्य असून, यापूर्वी हा प्रश्न मी लोकसभेत अनेकदा उपस्थित केला आहे. या प्रश्नावर महाराष्ट्रातील सर्वपक्षिय खासदारांची बैठक घेतली. या बैठकीस 23 खासदार उपस्थित होते. या प्रश्नाचे गांभीर्य दिल्लीच्या व्यासपीठावर जाणवावे. यासाठी कालच मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे माझा राजीनामा दिला आहे. यावर अनेक प्रस्थापीत नेते टिका करत आहेत,असे खा. पाटील यांनी म्हटले आहे.
यावर वाद-प्रतिवाद करून या प्रश्नाचे गांभीर्य घालवू इच्छित नाही. म्हणुन मी आज मौनव्रत धारण करून हे उपोषण करत आहे, असे खा. पाटील यांनी म्हटले आहे. दिल्लीतील त्यांच्या या लाक्षणिक उपोषणास राजकीय. व इतर स्तरातून पाठिंबा मिळत आहे.