टाटा समूहाच्या मालकीची विमान कंपनी एअर इंडियाला पुढील 18 महिन्यांसाठी दर सहा दिवसांनी एक नवीन विमान मिळणार आहे. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) कॅम्पबेल विल्सन यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. विल्सन यांनी सांगितलं की, एअर इंडिया कंपनीने एकूण 470 विमानांची ऑर्डर दिली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एअर इंडियाची नवीन विमाने तैनात केली जात आहेत. एअर इंडियाच्या सीईओंनी म्हटलं आहे की, आम्ही अनेक नवीन क्रू आणि कर्मचाऱ्यांची भरती करत आहोत. कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण देण्यात येत आहे.
दर 6 दिवसांनी एअर इंडियाच्या ताफ्यात एक नवीन विमान
एअर इंडियाने 470 विमानांची ऑर्डर दिली आहे आणि पुढील 18 महिन्यांत दर सहा दिवसांनी एअर इंडियाच्या ताफ्यात एक नवीन विमान सामील होणार आहे. एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन यांनी याबाबत सांगितलं आहे. असोसिएशन ऑफ एशिया पॅसिफिक एअरलाइन्सच्या अध्यक्षांच्या 67 व्या संमेलनात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण पद्धतीतही सुधारणा
एअर इंडियाच्या सीईओंनी सांगितलं की, "आमच्याकडे नवीन विमाने आहेत, आम्ही अनेक, अनेक नवीन क्रू आणि कर्मचारी भरती करत आहोत, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण पद्धतीत सुधारणा करत आहोत आणि आम्हाला अजून काम करायचे आहे आणि आम्ही चांगली प्रगती करत आहोत." त्यांनी पुढे सांगितलं की, एअर इंडियाच्या बहुसंख्य ग्राहकांना विश्वासार्हता आणि वक्तशीरपणा हवा आहे आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे हे आमच्यासमोरचं आव्हान आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन विमानांची तैनाती
नवीन विमाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तैनात करण्यात येत असल्याची माहिती विल्सन यांनी दिली आहे. यासह, बहुतेक जुनी विमाने विमाने सेवेत आणली गेली आहेत. टाटाच्या मालकीच्या एअर इंडिया कंपनीने भारतीय अर्थव्यवस्थेला आठ टक्के वाढीव वार्षिक वाढ दराने (CAGR) सेवा देण्यासाठी 470 विमानांची ऑर्डर दिली आहे आणि पुढील 18 महिन्यांत दर सहा दिवसांनी एक नवीन विमान घेण्याची एअर इंडियाची तयारी आहे.
प्रवाशांना नवा अनुभव आणि सेवा देण्याचा विचार
विल्सन यांनी इतर विमान कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा आणि एअर इंडियासाठी वाहतूक वाढविण्याचा विश्वासही व्यक्त केला. एअर इंडिया ही देशांतर्गत विमान कंपन्यांमध्ये सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे नेटवर्क असलेली विमान कंपनी आहे. आगामी काळात कंपनी आपल्या ताफ्यात विमानांची संख्या वाढवून प्रवाशांना नवा अनुभव आणि सेवा देण्याचा विचार करत आहे.